निवडणूक आली तरी वळसे पाटील रस्त्यावर येऊन कधी संघर्ष करणार ? प्रदूषण,पाणी आणि संघर्ष
निमगाव भोगी : पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या निमगाव भोगी ( ता.शिरूर ) गावातील पाणी प्रदूषणाचा मोठा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा शब्द देखील ग्रामस्थांना दिला होता. प्रदूषण आहे, रस्ता आहे, मात्र संघर्ष गावकऱ्यांनाच करावा लागत आहे.
पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड या औद्योगिक हानिकारक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या विरोधात शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी शेतकरी व ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून आंदोलन आणि उपोषणाचा बडगा पुकारला आहे.
एकूण 5 किलोमीटर क्षेत्र हे पूर्णतः नापीक झालेले असून या जमिनीवर एकही पीक पिकत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत आहे.शेती नापीक झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, एम.ई.पी.एल. कंपनीला वाढीव क्षेत्र न मिळणे,निमगाव भोगी गावाला एमआयडीसीकडून ग्रामस्थांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळावे,कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अशा मागण्या शेतकरी ग्रामस्थांच्या आहेत.
२००९ नंतर शिरूर तालुक्यातील ४२ गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जोडली गेली आहे.२००६ साली कंपनी एमआयडीसी परिसरात आली व आंबेगाव शिरूर मतदारसंघ जोडल्यानंतर प्रदूषणाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी १५ वर्षे आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र जनतेची दिशाभूल करण्याचा काम करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी खंडाळे (ता.शिरूर) याठिकाणी वळसे पाटील यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे सांगितले होते. 'शिरूरच्या परिसरामध्ये असलेली कंपनी त्यांच्या बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे अनेक गावांचे पाण्याचे स्त्रोत खराब होत आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या जीवनावर, आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. यासंदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून निवेदन देखील दिले आहे. परत एकदा अशीच बैठक घेऊन राज्यस्तरावर देखील हा विषय मार्गी लावणार आहे आणि जर याच्यातून विहित वेळेत मार्ग निघाला नाही तर या भागातले सगळे लोक माझ्यासहित रस्त्यावर उतरून संघर्ष करतील.'
वळसे पाटील यांनी अनेक बैठका प्रशासानासोबत घेतल्या आहेत. मात्र बैठकीत या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ मिळावा आणि योग्य ती कार्यवाही आम्ही करू असे प्रशासनाच्या वतीने फक्त आश्वासन देण्यात आले.अनेक वेळा आंदोलन, उपोषा झाली आहेत. मात्र या गोष्टींना कधी मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला, तर कधी आंदोलन मोडीत काढण्याचा काम केलं गेलं आहे. मात्र लोकप्रतिनिधी कडे वेळोवेळी पाठपुरावा करून ग्रामस्थांच्या पादत्राने झिजली, परंतु निगरगट्ट लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांची दाहकता कळाली नाही. ' शेतकरी-ग्रामस्थ रस्त्यावर उतरले, मात्र लोकप्रतिनिधी एसी गाडीच्या खाली उतरायला तयार नाही.
